महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपूर्वी गायरान विषय चांगलाच चर्चेत आला होता.आणि या विषयामुळेच खरंतर सर्वसामान्य जनतेलासुध्दा आपल्या गावात किती गायरान आहे? याची माहिती मिळवण्याची उत्सुकता लागली.
आता तर सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रुक येथील एका युवकाने आपल्या गावातील शंभर एकर गायरान चोरीला गेले असल्याची तक्रार गावच्या ग्रामसेवकाला केली आहे .” पुढार्यांनी लुटलेली ही गायरान शेती याबाबत शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा उपोषणाला बसेल.” अशा पद्धतीचे निवेदन आलेगाव येथील जोतीराम राजगुरू या युवकाने गावच्या ग्रामसेवकास दिले आहे.
आलेगाव बुद्रुक येथील ग्रामसेवक यांना दिलेल्या निवेदनात ज्योतीराम राजगुरू म्हणतात की,” जसे मराठी चित्रपटात विहीर चोरीला जाते तसे माझ्या गावातील गायरानच चोरीला गेले आहे आणि हे गायरान पूढार्यांनी हडप करून यामध्ये केळी, ऊस अशा पद्धतीचे पिकेही घेतली आहेत. त्यामुळे गोरगरिबांना राहण्यासाठी जागा नाही. त्यामुळे ही जागा लवकरात लवकर शासनाच्या ताब्यात घ्यावी. अन्यथा उपोषणाचे अस्त्र वापरले जाईल.” असेही या निवेदनात म्हटले आहे.
खरंतर गाव पातळीवर राजकारण, दबाव तंत्र आणि पुढारी या सर्वांच्या विरोधात बंड करत या युवकाने एक प्रकारे धाडसच केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ग्रामसेवक याचा कशा पद्धतीने पाठपुरावा करतील याकडे सर्वांचे लक्ष राहील. परंतु या युवकाच्या या निवेदनामुळे प्रशासनाची मात्र पूरती कसरत होणार हे नक्की.
Home Uncategorized “साहेब माझ्या गावातील गायरानच चोरीला गेले आहे..” गावातीलच युवकाचे अनोखे निवेदन. प्रशासनाची...