विकास… विकास… विकास… गेल्या अडीच वर्षापासून हा शब्द इंदापूर तालुक्यात सतत ऐकायला मिळत आहे.. आणि त्यात सत्यता सुद्धा आहे कारण माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या कार्य कुशलतेने व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याला भरघोस निधी आणला हे त्रिवार सत्य आहे…
पण याच विकासाचा जर दुसरा भाग पाहायला गेलं तर मामांनी निधी आणला खरा पण कॉन्ट्रॅक्टर लोकानी त्या निधीचा योग्य वापर केला का? हे पहात असताना उदाहरण म्हणून शेटफळ हवेली येथील जल जीवन योजनामध्ये झालेला भोंगळ कारभार पाहायला मिळाला..
आमदार दत्तात्रय भरणे व सुप्रियाताई सुळे यांनी मोठ्या गाजावाजात शेटफळ हवेली येथे कधी नव्हे तेवढा म्हणजेच एक कोटी पासष्ट लाखाच्या जल जीवन योजनेसाठी निधी दिला.. निधी देण्याच्या आधी कधी नव्हे ते शेटफळ हवेली येथे काही ठिकाणी डांबरीकरण झाले व काही ठिकाणी मंजूर ही झाले ते सुद्धा भरणे मामांच्या माध्यमातून..
या सर्व गोष्टीत एक गोष्ट प्रामुख्याने निदर्शनास येते ती म्हणजे की,जलजीवन योजनेसाठी लागणारी जी पाईपलाईन आवश्यक होती ती डांबरीकरण खोदून रस्त्याच्या मधोमध टाकली गेली आहे.यावरून संबंधित कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार कोणत्या मानसिकतेतून हे काम करतोय हे प्रखर्तेने दिसते.
या कामात झालेली अनियमितता लक्षात घेऊन शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी उपकार्यकारी अभियंता व गटविकास अधिकारी यांना लिखित तक्रार सुद्धा केली आहे.यात शेटफळ हवेली येथे जलजीवन अंतर्गत पाईप लाईनचे काम भोडणी, रेडा, सुरवड, भांडगाव या रस्त्याच्या साईड पट्या व काही ठिकाणी रस्ता JCP ने डांबरी खोदुन रस्त्याच्या मधोमध पाईप गाडल्या जात आहेत भविष्यात लिकेज होण्याचा दाट संभव आहे तसेच रोड मधून पाईप क्रॉस करताना सिमेंट किवा लोखंडी पाईप टाकणे गरजेचे आहे. तसेच निवेदे प्रमाणे काम न करता अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला निकृष्ट दर्जाचे चालेले काम त्वरित थांबवण्यात यावे अशी यात विनंती केली आहे. त्याचबरोबर यात निवेदन देऊनही अनियमितता आढळल्यास संबंधित कार्यलयासमोर स्थानिक ग्रामस्थ बरोबर घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी आपली जबाबदारी राहील याची आपण गांभीर्य पूर्वक दखल घ्यावी. असे गट विकास अधिकारी व उपकार्यकारी अभियंता यांना पत्र दिलेले आहे.आता हे तक्रारी पत्र देऊन सुध्दा काम संपवण्याची किंवा उरकण्याची घाई कोणासाठी ? हे काम ठेकेदारासाठी की जनतेसाठी हाच प्रश्न पडतो.
मुळात इंदापूरचे कर्तव्यदक्ष आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी सुद्धा निकृष्ट दर्जाच्या काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टदारांना काळ्या यादीत टाकू असे आश्वासित केले होते मग आता इंदापूर तालुक्यातील एकाच गावची ही परिस्थिती असेल तर इतरही गावची छाननी केली जाणार का? व यातून खरा विकास बाहेर येणार का? हाच प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी यात त्वरित लक्ष घालणं महत्त्वाचे आहे. परंतु गावागावात चाललेला असा विकास गावकरी शांत डोळ्याने पाहत आहेत व मनातल्या मनात म्हणत आहेत “मामा… आता अशा ठेकेदारांना हकला ओ….!”