धमक्या-दबावाला न जुमानता, शेवटपर्यंत आपल्या साक्षीवर ठाम होते कॉन्स्टेबल रवींद्र पाटील!

एखादा गुन्हा करणं आणि तो करून पळून जाणं हे गुन्हा करण्यापेक्षा वाईट गोष्ट आहे. मुळात गुन्हा करणं हिच चुकीची बाब आहे. मात्र लोकशाही स्वीकारलेल्या आपल्या देशात कायद्यांच्या कचाट्यातून पळून बिनधास्तपणे समाजात वावरणारे अनेक ठग आपण बघत असतो.

गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान हे नाव चर्चेत आले आहे, त्याने केलेल्या पराक्रमुळे आता त्याच्या वडिलांना म्हणजे शाहरुख खानला तोंड लपवण्याची वेळ आली आहे. ज्या दिवशी आर्यनला पकडले त्याच रात्री आपला सल्लू भाई शाहरुखला भेटायला गेला बहुदा कोणता वकील कर हे सांगण्यासाठी गेला असावा. दोघांच्या भेटीवरून अनेक चर्चांना उधाण आले सोशल मीडियावर जोक्स फिरू लागले होते.

याच ऑक्टोबर महिन्यातील ४ तारखेला एका कॉन्स्टेबलचे निधन झाले होते. रवींद्र पाटील असं त्यांचं नाव, हेच रवींद्र पाटील सल्लू भाईच्या ‘त्या’ केसचे एकमेव साक्षीदार, ज्यांनी अखेरपर्यंत आपली साक्ष बदलली नाही. नेमकी काय घटना आहे चला जाणून घेऊयात…

ती घटना २००२ सालातली आपल्या सल्लू भाईला अंडरवर्ल्डमधून धमक्या येत होत्या म्हणून संरक्षणासाठी एका हेड कॉन्स्टेबलची नेमणूक करण्यात आली. ते कॉन्स्टेबल दुसरे तिसरे कोण नसून रवींद्र पाटील होते. मूळचे धुळ्याचे असलेले रवींद्र १९९८ पासून पोलीस सर्विसमध्ये दाखल झाले होते.२८ सप्टेंबरची ती काळी रात्र, त्या रात्री सलमान आपल्या एका मित्रासोबत लँड क्रुझर गाडीने वांद्रे परिसरातील एका बारमध्ये गेला. त्यांच्यासोबत रवींद्र पाटील देखील होते मात्र त्यांना बारच्या बाहेर थांबायला सांगितले. तिथून बाहेर पडून ते तिघे दुसऱ्या बारमध्ये गेले, गाडी सलमानच चालवत होता. रात्री २च्या सुमारास ते दोघे बाहेर पडले.

सलमान मद्यधुंद होता तरीदेखील त्याने पुन्हा गाडी चालवली, रवींद्र पाटील यांनी त्याला गाडी न चालवण्याचा सल्ला दिला, मात्र नशेत असलेल्या सलमानने त्याला नकार दिला. सलमानने इतकी दारू प्यायली होती की त्याला रस्त्यावरचे वळण दिसले नाही आणि भरधाव वेगात असलेली गाडी थेट एका बेकरीत घुसली, त्याच बेकरीच्या फुटपाथवर असलेल्या काही मजुरांच्या अंगावरून ती गाडी गेली ज्यात एकाच मृत्यू झाला तर बाकीचे जखमी झाले.सलमान आणि त्याच्या मित्राने शिताफीने तिथून पळ काढला, मात्र कर्तव्यदक्ष अधिकारी असलेले रवींद्र मात्र तिथेच उपस्थित होते. त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये सलमान विरोधात FIR दाखल केली आणि घडलेल्या प्रकाराची रितसर माहिती दिली.

कोर्टात केस पडली या घटनेचे एकमेव साक्षीदार होते ते म्हणजे रवींद्र पाटील, साक्ष देण्याच्या वेळ आली तेव्हा त्यांच्यावर दबाव टाकले गेले. हाय प्रोफाईल केस असल्याने जो तो आपली कातडी वाचवत होता, मात्र रवींद्र पाटील यांनी शेवटपर्यंत ठाम राहिले. सलमान आणि इतर लोकांमुळे होणाऱ्या दबावामुळे ते डिप्रेशनमध्ये गेले आणि साक्ष देण्यासाठी कोर्टात गैरहजर राहिले.कोर्टाने त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट काढले तसेच नोकरीवर गैरहजर राहिल्याने त्यांना नोकरीवरून काढण्यात आले. पोलिसांचा ससेमिरा त्यांचा पाठी होताच त्यातच ते गायब झाले. त्याच्या कुटुंबावर देखील दबाव टाकण्यात आला होता, अखेर पोलिसांनी त्यांना महाबळेश्वर येथे पकडून तुरुंगात टाकले. तुरुंगात त्यांचे हाल केले गेले असं त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.

तुरुंगातून बाहेर आल्यावर ते भीक मागताना देखील आढळून आले होते. एकाकी पडलेल्या रवींद्र पाटीलांनी शेवटी दारूचा आधार घेतला, नंतर ते दारूच्या इतक्या अधिन झाले की त्यांना टीबी झाला आणि ते शिवडीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि तिकडचे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
एकूणच सलमानच्या या केसमध्ये अनेक तर्कवितर्क लावले गेले, एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टात ही केस फिरत राहिली जी आजतगायत फिरते आहे. ‘सलमान आपल्या ट्रस्टमधून गरिबांची मदत करतो,ऑपरेशन करतो’, असे युक्तिवाद सलमानबद्दल सहानभूती मिळावी म्हणून वकिलाने केले.

ज्या खात्यात रवींद्र पाटील होते तिकडच्या लोकांनी देखील रवींद्र पाटीलांना मदत केली नाही उलट त्यांनी साक्ष फिरवावी यासाठी दबाव टाकण्यात येत होता प्रसंगी लाच सुद्धा ऑफर केली होती, मात्र शेवटच्या श्वासापर्यंत रवींद्र पाटील ठाम होते. वरील सर्व प्रकार वेगवेगळ्या दृष्टीने तर्कवितर्क करून सांगितला जातो. परंतु आयुष्यात जीवनाची चौकट सोडून काहीही झालं तरी जायचं नाही हेच्या रवींद्र पाटील यांच्या कहाणीतून समजून घ्यावे……



 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here