इंदापुर: राज्यात ३५० हून अधिक किल्ले असून, स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारणी केलेले हे दुर्ग महाराष्ट्रभूमीचा आणि येथील मराठी माणसाचा मानबिंदू आहेत…. त्यांना भेट देताना, तेथे नतमस्तक होऊन गडाची माती कपाळाला लावताना वेगळी ऊर्मी निर्माण होते अशी भावना इंदापुर शिवभक्त परिवाराची आहे. गेल्या काही वर्षापासून वेगवेगळे गड चढाई करत व त्या गडावरची स्वच्छता करीत शिवभक्त परिवार इंदापूर हे आपले कर्तव्य पूर्ण करत असल्याचे दिसून येत आहे.
जगाच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे केलेले उत्तुंग कार्य होय….. महाराजांनी त्यांच्या अनेक शिलेदारांना आणि मावळ्यांना सोबत घेऊन आपार कष्टातुन शौर्याने आणि जिद्धिने उभे केलेले गड किल्ले म्हणजेच आपल्या राजांच्या जाज्ज्वल्य इतिहासाची पुनःपुन्हा आठवण करून देणारी अखंड प्रेरणास्थानेच आहेत……इतिहासाची चिकित्सा करण्याचे बळही याच दुर्गांच्या माध्यमातून मिळते.
आत्मविश्वास, मानसिक ताकद देतानाच हे दुर्ग अखंड ऊर्जा देत राहतात.या दुर्गावर भ्रमंती करताना धगधगता इतिहास आपल्या उरात भरून आकाशाला गवसणी घालण्यासाठी उंच भरारी घेण्याचे सामर्थ्य मिळतेच मिळते.
निसर्गातील मोठा ठेवाही या दुर्गांच्या माध्यमातून अनुभवण्यास मिळतो.गेल्या 5-6 वर्षांपासून शिवभक्त परिवाराच्या माध्यमातून अनेक ध्येयवेडे शिवभक्त दर महिन्याला दुर्गभ्रमंती करत आहेत…. सोबत अभ्यासू, तज्ज्ञ, जिज्ञासू असे मार्गदर्शक डॉक्टर आसबे सर हे ही असतातच…
गड प्रवास म्हणजे मौजमस्ती नव्हे, तर गड़ावरील मातीपासून ते तेथील ऐतिहासिक साक्षीदार असलेली तटबंदी, कातळ कड़े यांच्यातून नवी प्रेरणा, ऊर्जा घेऊन वाटचाल करण्याचा एक प्रयत्न…..
कोरोना च्या संकटामुळे थोड़ी विस्कळीत झालेली शिवभक्त परिवाराची गड़प्रवास मोहिम या दिवाळी नंतर पुन्हा नेहमी प्रमाणे लवकरच सुरु होणार.