जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी परंपरेनुसार इंदापुर मध्ये श्री नारायणदास रामदास हायस्कूल या ठिकाणी मुक्कामास असते परंतु ही अनेक वर्षाची परंपरा खंडित करण्याचा प्रयत्न येथील प्रतिनिधी राज्याच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री करीत असल्याचे दिसून येत असून शहरातील नागरिक व वारकऱ्यांमध्ये याविषयी संताप व्यक्त केला जात आहे.पालखी मुक्कामाच्या स्थळात बदल झाल्यास वारकऱ्यांची मोठी गैरसोय होणार असून यामुळे स्थानिक नागरिकांच्या समस्यांमध्ये देखील वाढ होणार असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी सांगितले.
पालखी मुक्कामाच्या ठिकाणी श्री. नारायणदास रामदास हायस्कूल येथे सर्व वारकरी यांच्यासाठी मोठी व्यवस्था असते. येथे भव्य असे प्रांगण, वर्ग खोल्या आणि निवाऱ्यासाठी मैदान तसेच पाणी, लाईट यासारख्या सुविधा मुबलक असताना देखील केवळ राज्यमंत्र्यांच्या हट्टापायी आयटीआय या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा नसताना पालखी मुक्काम हलवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे तसेच जगद्गुरु श्री. संत तुकाराम महाराजांची पालखी इंदापूर शहरात मध्यवर्ती भागातून येत असताना भक्तीभावाचा व आनंदाचा उत्सव निर्माण झालेला असतो तोदेखील या कारणामुळे निर्माण होणार नसल्याने ते वेदनादायी ठरणार आहे.पालखी इंदापूर शहरामध्ये आली नाही तर छोटे व्यापारी आणि व्यावसायिक दुकानदार यांचे नुकसान होईल.सर्व वारकरी, स्थानिक नागरिकांची मनोमय भावना पालखी मुक्काम परंपरेनुसार श्री. नारायणदास रामदास हायस्कूल या ठिकाणीच राहावा अशीच असून प्रशासकीय यंत्रणेने लोकांच्या या भावनेचा विचार करून पालखी मुक्कामाच्या स्थळामध्ये बदल करू नये असे मत भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी व्यक्त केले.
Home आषाढी वारी राज्यमंत्र्यांच्या अनाठाई हट्टामुळे इंदापूर पालखी मुक्काम बदलण्याचा घाट- भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष...