इंदापूर : राज्य विधिमंडळामध्ये सन 1995 मध्ये सदस्य म्हणून आंम्ही एकाचवेळी प्रवेश केला. त्यानंतर सुमारे 20 वर्षे विधिमंडळामध्ये आंम्ही सहकारी म्हणून काम केले. निखळ मैत्रीचे गेली 30 वर्षे नाते जपणारा जवळचा मार्गदर्शक मित्र हरपला आहे, अशा शब्दात भाजप नेते व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खा.गिरीश बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली.पूणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून खा.गिरीश बापट यांनी राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली, त्यानंतर प्रचंड जनसंपर्क व कर्तुत्वाच्या बळावर त्यांनी राजकारणात मागे पाहिले नाही. भाजपचे ते निष्ठावंत पाईक होते. पुणे शहरामध्ये भाजपला सत्तेच्या सर्वोच्च स्थानी पोहचविण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. राज्य मंत्रीमंडळामध्ये अन्न व नागरी पुरवठा, संसदीय कार्य आदी विविध खात्यांचे मंत्री म्हणूनही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा निर्माण केला. तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांचे जिल्ह्याच्या विकासामध्ये योगदान आहे. पुण्याचे खासदार म्हणूनही त्यांनी संसदेत सातत्याने पुणे शहराच्या विकासाचे प्रश्न मांडले. गिरीशभाऊ हे आजारातून निश्चितपणे बाहेर येतील असा विश्वास आंम्हास होता, मात्र नियतीपुढे कोणाचा इलाज चालत नाही. गिरीशभाऊ, हे विकासाची दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते, त्यांच्या जाण्याने पुणे शहराची, त्याचबरोबर राज्य भाजपची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.