हर्षवर्धन पाटील यांचे इंदापूरात बेमुदत धरणे आंदोलन सुरू
– शेतकऱ्यांच्या वीज पुरवठा सुरु करण्याची मागणी
– दहा दिवसांपासून वीज पुरवठा खंडित.
इंदापूर :प्रतिनिधी दि.27/11/21
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा गेली 10 दिवसापासून महावितरणने पुर्णपणे खंडित केला आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून, जनावरांच्या व माणसांच्या पिण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र 10 दिवस झाले तरी शेतीचा वीजपुरवठा सुरु केला जात नसल्याने भाजपा नेते व मंत्री मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील महावितरण कार्यालयासमोर शनिवारी (27) सकाळपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पूर्ववत चालू होईपर्यंत माझे धरणे आंदोलन चालूच राहील, असे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केले आहे.
इंदापूर तालुक्यातील शेतीपंपाचा वीज पुरवठा वीज बिल थकबाकी वसुलीसाठी महावितरणने खंडित केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. इंदापूरचे लोकप्रतिनिधी असलेले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे गेली 10 दिवस झाले वीज तोडणी प्रश्नावर गप्प आहेत, एकही शब्द बोलत नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार व महावितरणच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. इंदापूर तालुक्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडी सरकारविरुद्ध गेली तीन-चार दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे. मात्र महाविकास आघाडी शासनाकडून शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने शेतीचे नुकसान वाढत चालल्याने भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्याच्या शेजारील तालुक्यांमध्ये शेतीचा वीजपुरवठा सुरू आहे, मग इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय का? इंदापूरचे लोकप्रतिनिधी असलेले मंत्री हे वीज पुरवठा सुरु करणेबाबत एकही शब्द बोलत नाहीत, त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याने त्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी राज्यमंत्री भरणे यांच्यावर वीज खंडित प्रश्नावर भडिमार केला. मी तुमचाच आहे, काही अडचण असेल तर मी सोडवीन असे तोंडावर गोड बोलणाऱ्या भरणे यांना शेतकऱ्यांचे होणारे नुकसान दिसत नाही का ? लोकप्रतिनिधी म्हणून असलेली जबाबदारी ते टाळत आहेत, अशी टीका बेमुदत धरणे आंदोलन प्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी केली. महावितरणने शेतकऱ्यांना दिलेली बिले जास्त आलेली असून अनेक हॉर्स पावरने वाढवून दिलेली आहेत. त्यामुळे चुकीची दिलेली बिले दुरुस्त करावीत व बिल दुरुस्तीसाठी कक्ष उघडावेत. शासनाने वीज बिलामध्ये मोठी सवलत द्यावी व सवलत देय रक्कम भरण्यासाठी टप्पे पाडून दिल्यास शेतकरी बिल भरण्यात सहकार्य करतील, असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आपासाहेब जगदाळे यांनी वीज प्रश्न सोडवण्यास तालुक्याचे लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे हे पूर्णपणे अपयशी ठरल्याचा हल्लाबोल केला. त्यांना शेतकऱ्यांचे काहीही देणेघेणे नाही अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी अँड. कृष्णाजी यादव, विलासराव वाघमोडे, बाबासाहेब चवरे, शरद जामदार, शकील सय्यद, देवराव जाधव, निवृत्ती गायकवाड, मोहन दुधाळ, गजानन वाकसे, रमेश खारतोडे, रणजीत पाटील, भाऊसो चोरमले, राजेंद्र पवार, नेताजी लोंढे, महादेव गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त करून महाविकास आघाडी सरकार व इंदापूरच्या लोकप्रतिनिधीवर जोरदार टीकास्त्र सोडले. बेमुदत धरणे आंदोलनामध्ये आप्पासाहेब जगदाळे यांचेसह भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले असून आंदोलनाच्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते, शेतकरी मोठी गर्दी करीत आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी महावितरणकडून शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरु करेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरु राहील, असे जाहीर केल्याने इंदापूर तालुक्यातील वातावरण पेटले आहे. त्यामुळे प्रशासनावरील ताण वाढला आहे.